विरोधकांची सावध प्रतिक्रिया
नगर – जम्मु -काश्मिरमध्ये लागू केलेले 370 वे कलम आज केंद्र शासनाने रद्द केल्याबद्दल देशात भाजपसह हिंदूत्ववादी संघटनांच्या वतीने जल्लोष करण्यात आला. या संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले. ठिकठिकाणी या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढे वाटून आनंद व्यक्त केला.भाजपसह समविचारी पक्षांनी या निर्णयाचे तोंडभरून कौतुक केले. तर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाने सावध प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीर बाबतचे 370 कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला त्याच बरोबर जम्मू काश्मीर व लड्डाख यांना केंद्र शासित प्रदेश म्हणुन दर्जा दिला हा एक ऐतिहासिक निर्णय आहे, स्वर्गीय शामा प्रसाद मुखर्जी यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही आज खऱ्या अर्थाने जम्मु काश्मीर ची जनता मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आली आहे.
प्रा भानुदास बेरड, जिल्हाध्यक्ष भाजपा अहमदनगर
संपूर्ण देशाला स्वातंत्र्य मिळालेले असतांनाही जम्मू-काश्मीरच्या रुपाने दोन वेगळे कायदे एकाच देशात चालविले जात होते. हा सर्व सामान्य भारतीयांच्या मनात गेली 69 वर्षे सलत होता यापूर्वीच्या राज्यकर्त्यांत हे कलम रद्द करण्याची इच्छाशक्ती च्या अभावामुळे ते हे कलम रद्द करू शकले नाहीत.
प्रा. राम शिंदे, पालकमंत्री
370 वे कलम रद्द करण्याचे आश्वासन निवडणुकिच्या वेळी देण्यात आले होते त्यची पूर्तता करण्यात सरकारला यश आलं.असे धाडसी निर्णय भारतीय जनतापक्षच घेवू शकतो. आज संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण असून पंतप्रधान मोदी -शहा यांच्या या धाडसी निर्णयाचेबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.
बाबासाहेब वाकळे महापौर, अहमदनगर महापालिका
370 वे कलम हटविण्याला कोणाचाच विरोध असायचे कारण नाही. देशाचे माजी पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरूंनीही कधी ना कधी हे कलम हटवावेच लागेल असे वक्तव्य केले होते. फाळणीच्या वेळी ज्या ज्या राज्यांचा विलिनीकरणाला विरोध होता. त्या-त्या राज्यांशी काही करारमदार करण्यात आले. पुढे त्या राज्यांशी चर्चा करून ते प्रश्न सोडवून ती राज्य भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आली. मात्र या सरकारने काश्मिर मधील नेत्यांना स्थानबद्ध करून 370 वे कलम हटविले. त्यापेक्षा चांगल्या चर्चेच्या मार्गाने हा प्रश्न सुटूू शकला असता. काश्मिरला भारतीय घटनेत आणलं हे योग्यच झाले. 370वे कलम हटविण्याला आमचा विरोध कधीच नव्हता आणि नाही मात्र ते तेथील जनतेच्या संमतीने व्हायला हवे होते.
राजेंद्र फाळके जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्ष