सातारा – जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये झालेल्या भूस्खलनामुळे वाई, पाटण, महाबळेश्वर, सातारा, जावळी तालुक्यातील 26 जणांचा मृत्यू झाला. छत पडून एक, दरड कोसळल्यामुळे दोन तर पुराच्या पाण्यामुळे आठ अशा एकूण 37 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
वाई तालुक्यातील तीन, जावळी तालुक्यातील चार, पाटण तालुक्यातील 27, सातारा तालुक्यातील दोन तर महाबळेश्वर तालुक्यातील एकाचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, भूस्खलन व पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्यांचा अद्याप शोध सुरु असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, रस्ते, पूल वाहून जाण्याचे प्रकार घडल्याने मदतकार्यात अडचणी येत होत्या.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन गतीने
मदतकार्य होण्यासाठी पुढाकार घेतला असून अद्यापही मदतकार्य सुरु आहे. सततचा पाऊस आणि दळणवळणाची गैरसोय यामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत.
जिल्ह्यात वाई तालुक्यातील कोंढावळे येथील दोन महिलांचा भूस्खलनामुळे तर एका पुरुषाचा छत पडून मृत्यू झाला आहे. जावळी तालुक्यातील रेंगडी येथील दोन महिला, मेढा येथील एका पुरुषाचा व वाटंबे येथील एका पुरुषाचा पुराच्या पाण्यामुळे मृत्यू झाला आहे.
पाटण तालुक्यातील बोंद्री येथील एक पुरुष, जळव येथील एका पुरुषाचा पुराच्या पाण्यामुळे मृत्यू झाला आहे. मंद्रुळकोळे येथील एका पुरुषाचा दरड कोसळल्याने मृत्यू झाला. आंबेघर तर्फ मरळी येथील पाच पुरुष व सहा महिलांचा तर काहीर येथील एका महिलेचा भूस्खलनामुळे मृत्यू झाला आहे.
रिसवड येथील दोन पुरुष व दोन महिलांचा भूस्खलनामुळे मृत्यू झाला आहे. मिरगाव येथील चार पुरुष व चार महिलांचा भूस्खलनामुळे मृत्यू झाला आहे. सातारा तालुक्यातील कुस बुद्रुक येथील एका महिलेचा व कोंडवे येथील एका युवकाचा पुराच्या पाण्यामुळे मृत्यू झाला आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील घावरी येथील एका पुरुषाचा दरड कोसळल्याने मृत्यू झाला. पाटण तालुक्यातील भूस्खलनामुळे गाडले गेलेल्या लोकांचे शोध व बचावाचे काम सुरु असून अद्यापही पाच नागरिक बेपत्ता आहेत.
जावळी व वाई तालुक्यातील प्रत्येकी दोन व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु असल्याची माहिती शेखर सिंह यांनी दिली.