पुणे – पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रात शिवकालापासून साजरा केला जाणारा आणि तब्बल 350 वर्षांची परंपरा असलेली श्री कृष्णाबाई उत्सव यावर्षी साजरा केला जाणार नाही, असे ठिकठिकाणच्या उत्सव संयोजकांनी जाहीर केले आहे. “करोना’ या महामारीचा प्रतिबंध करण्याकरीता राज्य शासनाने साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, क्रिमिनल प्रोसीजर कोड 1973 चे कलम 144 (जमावबंदी), आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 32, 33, 41 व 51 ला अनुसरून सर्व प्रकारचे धार्मिक कार्यक्रम उत्सव यात्रा-जत्रा यास बंदी घातली आहे.
त्यामुळे लिंब-सातारा येथील चैत्र शु. दशमी अर्थात 3 ते 8 एप्रिल दरम्यान व्हावयाचा हा उत्सव यावर्षी होणार नाही, असे श्रीकृष्णाबाई उत्सव संस्थेचे विश्वस्त विश्वास आपटे यांनी कळवले आहे. यासंदर्भात विश्वस्त आपटे यांच्या निवासस्थानी नुकतीच एक बैठक झाली. त्यामध्ये “करोना’ या महामारीच्या पार्श्वभूमीवर सन 2020 चा कृष्णाबाई उत्सव आयोजित न करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या उत्सवाला पुण्या-मुंबईतूनही मोठ्या प्रमाणात भाविक हजेरी लावतात.
हा कृष्णाबाई उत्सव म्हणजे कृष्णाकाठच्या लोकजीवनाचे प्रतिबिंब असते आणि उत्सवादरम्यान विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. महाबळेश्वरला जेथे कृष्णानदीचा उगम होतो तिथपासून कृष्णाकाठच्या बहुतांश गावांमध्ये जानेवारी ते एप्रिलदरम्यान हा उत्सव साजरा केला जातो. त्यामध्ये वाईमधील सातही घाट, भुईंज, लिंब-गोवे, माहुली-सातारा, उंब्रज, कऱ्हाड, सांगली, हरिपूर अशा विविध ठिकाणांचा समावेश असतो. यानिमित्ताने जनजागृती आणि सांस्कृतिक देवाण-घेवाणही होत असते. यंदा “करोना’च्या साथीमुळे 350 वर्षांत प्रथमच या उत्सवावर संक्रांत आली आहे.