पुणे – खडकवासला धरणसाखळी परिसरात पावसाने विश्रांती घेतली आहे. गेल्या 24 तासांत केवळ टेमघर धरणक्षेत्रात 2 मिमी पावसाची नोंद झाली असून, खडकवासला, वरसगाव आणि पानशेत धरण परिसरात पाऊसाचा शिडकावा झाला.
मात्र, खडकवासला धरणातून अजूनही 3 हजार 424 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तर, टेमघर धरणातून सुरू असलेला विसर्ग बंद करण्यात आला आहे. शनिवारी (दि. 17) दिवसभर या चारही धरणांच्या परिसरात पावसाने उघडीप दिली. त्यातच शनिवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे खडकवासला धरणपरिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.
पाण्याची पातळी वाढल्यामुळे धरणात उतरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. चारही धरण 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या पाण्याचा प्रश्न आता सुटला असून, अजूनही पावसाचे दीड महिना आहे. त्यातच परतीचा पाऊस पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण, गतवर्षी परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे धरणे 100 टक्के भरली आणि नियोजन फसले. यावेळी विचार करूच पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.