रवींद्र कदम
नगर – सर्वसामन्य कुटुंब असो किंवा उच्चशिक्षीत कुटुंबीय त्यांच्या मुलांच्या अट्टाहासापायी त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यास कुठेही कमी पडतांना दिसत नाही. मुलांना क्लासेसला जाण्यासाठी दुचाकी तसेच मोबाईल दिला जात आहे. मात्र, मुले मोबाईल, फेसबुक, व्हॉटस ऍप अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमप्रकरणाच्या भूलथापांना बळी पडत आहे.
मात्र याकडे पालकांचेही दुर्लक्ष झाले असल्याचे दिसत असून, जिल्ह्यात 332 अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले आहे. याबाबत अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाकडे गुन्हे दाखल झाले असून 254 मुलींची सुटका करण्यात आली आहे. मात्र गुन्हे वाढत असल्याने पालकांनीही लक्ष देण्याची गरज अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.
अल्पवयीन मुलींबरोबर 73 अल्पवयीन मुलांचे अपहरणाची नोंद झाली असून, त्यातील 67 गुन्ह्यांची उकल झाली आहे. त्याच बरोबर 6 पुरुषांचे व 9 महिलांचे अपहरणाचे गुन्हे दाखल झाले आहेत. 2018 ते 19 मध्ये शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अपहरणाच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये सर्वाधीक घटना एमआयडीसी पोलीस ठाणे, संगमनेर, तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. सोशल मीडियावरील भुलथापांना बळी पडलेल्या अल्पवयीन मुली ह्या 14 ते 17 वयोगटामधील सर्वाधिक प्रमाण असल्याचे आढळून आले आहे.
याघटनाबाबत जिल्ह्यातील संबधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जातो. व या घटनेचा तपास चार महिन्यांच्या आत लागला नाही तर तो गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग केला जातो. त्यामुळे गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्या हद्दीत घडलेल्या घटनेचा आकडा वाढतच चालला असून 332 वर पोहचला आहे. बळजबरीने अपहरण झाल्याच्या घटना कमी आहेत. मात्र, सातवी ते बारावी मधील विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. विद्यार्थ्यांचा मोबाईलचा वाढता वापर, मुलांचे आकर्षण अशा प्रकारामुळे मुली प्रेमाच्या जाळ्यात फसतात. व स्वत: हुन पळून गेल्याच्या घटना जास्त असल्याचे निदर्शनास आल्या आहेत.
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत 67 बालके दिली पालकांच्या ताब्यात
जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान ही शोधमोहीम राबवून रेकॉर्डवरील 36 बालकांपैकी 27 मुली, 9 मुले मिळून आले आहेत. ही सर्व बालके पालकांच्या ताब्यात देण्यात आली आहे. तसेच रेकॉर्डव्यत्तिरिक्त 21 बालकांपैकी 10 मुली, 11 मुले असे एकूण 67 मुले पालकांच्या त्याब्यात देण्यात आली आहेत. अशी माहिती अनैतिक मानवी वाहतुक कक्षाचे हेड कॉन्स्टेबल सोमनाथ कांबळे यांनी सांगितले.