धरण शंभर टक्के भरले; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा
लोणंद (प्रतिनिधी) – सातारा व पुणे जिल्हयाच्या सीमेवर असणाऱ्या वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडाभरातील दमदार पावसामुळे वीर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता वीर धरणाच्या चार दरवाज्यांतून 32 हजार 368 क्युसेस तर विद्युतगृहातून 800 क्युसेक पाणी नीरा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती वीर धरण उपविभागाचे सहायक अभियंता विजय नलवडे यांनी दिली.
वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधे नीरा खोऱ्यात असलेली भाटघर 75 टक्के, नीरा देवधर 63 टक्के, गुंजवणी 92 टक्के ही सर्व धरणे पावसामुळे भरण्याच्या मार्गावर आहेत तर वीर धरण शंभर टक्के भरले आहेत.
वीर धरणातून गुरूवारी सकाळी दहा वाजता सात हजार क्युसेक असलेला विसर्ग दुपारी दीडपासून 14 हजार क्युसेक एवढा वाढवण्यात आला. मात्र, पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे धरणातील पाण्याची आवक वाढत असल्यामुळे संध्याकाळी पाच वाजता धरणाचा विसर्ग 32 हजार 368 क्युसेक विसर्ग नीरा नदीमध्ये करण्यात येत आहे. विद्युत गृहातूनही 800 क्युसेक पाणी आधीपासूनच सोडले जात आहे.
एकुण सुमारे 33 हजार क्युसेक विसर्ग होत असल्याने वीर धरण प्रशासनाच्या वतीने नीरा नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कोणीही नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.