पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) प्रश्नपत्रिका व अंतरिम उत्तर सूचीतील पर्यायी उत्तरांबाबत 3 हजार 847 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन आक्षेप नोंदविले आहेत. विद्यार्थ्यांकडून आक्षेपांचा पाऊस झाला आहे. विषय तज्ज्ञांमार्फत त्यांची तपासणी करून योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.
राज्यात 19 जानेवारीला “टीईटी’ परीक्षा घेण्यात आली होती. यासाठी एकूण 3 लाख 43 हजार 283 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात पेपर क्रमांक 1 साठी 1 लाख 88 हजार 687 व पेपर क्रमांक 2 साठी 1 लाख 54 हजार 596 जणांनी नोंदणी केली होती. एकूण 1 हजार 44 केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती.
या परीक्षेची अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध करून त्यावर आक्षेप मागविले होते. यासाठी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर स्वतंत्र ऑनलाइन लिंक उपलब्ध करून दिली होती. पेपर क्रमांक 1 साठी 1 हजार 890 विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदविले. पेपर क्रमांक 2 साठी 1 हजार 957 जणांनी आक्षेप घेतला. यातील गणित व विज्ञान विषयांसाठी 355 तर, सामाजिक शास्त्रासाठी 1 हजार 602 विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदविले आहेत. त्याच सारख्या प्रश्नांवर आक्षेपांची नोंद झाली आहे. एकूण 35 ते 40 प्रश्नांबाबतच्या आक्षेपाची नोंद झाली आहे.
मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकेबात शुद्धलेखन व इतर बाबी विषयी सर्वाधिक आक्षेप घेण्यात आले आहेत. इंग्रजी माध्यमाबाबत 45, उर्दू 12, हिंदी 3 याप्रमाणे आक्षेपांची नोंद झाली. दाखल आक्षेपांची येत्या 13 व 14 फेब्रुवारी रोजी विषय तज्ज्ञांमार्फत तपासणी होणार आहे. त्यानंतर अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध होणार आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात
परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली.
आठ प्रश्न रद्द…
“टीईटी’च्या पेपर क्रमांक 1 मधील 6 व पेपर क्रमांक 2 मधील 2 असे एकूण 8 प्रश्न विविध कारणांनी रद्द केले आहेत. उर्वरित प्रश्नांच्या एकूण गुणांमधून विद्यार्थ्यांना गुण देण्यात येणार आहेत. प्रश्नांना पर्याय न देणे, गणितासाठी चिन्ह छपाई न करणे, प्रश्न अर्धवट देणे, प्रश्नातील शब्दांना अधोरेखित न करणे आदी काही कारणांमुळे प्रश्न रद्द केले आहेत. विषय तज्ज्ञांच्या तपासणी पूर्ण झाल्यानंतर आणखी काही प्रश्न रद्द होण्याची शक्यता आहे.