जकार्ता – सुमारे 300 रोहिंग्ये आज समुद्रमार्गे इंडोनेशियामध्ये दाखल झाले आहेत. जवळपास 7 महिने समुद्रातून प्रवास करून हे रोहिंग्ये इंडोनेशियामध्ये जाऊन पोहोचले आहेत, असे संयुक्त राष्ट्राच्या शरणार्थ्यांच्या विभागाने म्हटले आहे.
म्यानमारमधून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर रोहिंग्यांनी भारत, बांगलादेशबरोबर अन्य काही देशांमध्येही आश्रय घेतल्याची उदाहरणे पुढे आली होती. त्यातील हा प्रवास आतापर्यंतचा सर्वाधिक जास्त लांबचा असल्याचे या वृत्तामुळे स्पष्ट झाले आहे.
या शरणार्थ्यांमध्ये डझनहून अधिक मुले आहेत. एका लाकडी बोटीतून हे सर्वजण सुमात्रा बेटाच्या उत्तरेकडेला असलेल्या लोकसेमवे शहराच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचले. स्थानिक नागरिकांनी या सर्वांना किनाऱ्यावर उतरण्यास मदत केली. या प्रवासादरम्यान या रोहिंग्यांपैकी 30 जणांचा मृत्यू झाला होता. बांगलादेशातील कोक्स बझार येथून या वर्षी फेब्रुवारीमध्ये या रोहिंग्यांनी आपल्या सागरी प्रवासाला सुरुवात केली होती.
तीन वर्षांपूर्वी म्यानमारमध्ये लष्करी सामर्थ्याच्या जोरावर रोहिंग्यांना हाकलून देण्यात आल्यावर अन्य देशांबरोबर इंडोनेशिया आणि शेजारील मलेशिया या मुस्लिम बहुल देश त्यांच्यासाठी सुरक्षित आश्रयस्थाने ठरली होती.
त्यांनी प्रवासाला सुरुवात केली तेंव्हा इतक्या दूरच्या प्रवासाची कोणतीही पूर्वतयारी केली नव्हती. तसेच किती दिवस समुद्राचा प्रवास क्रायला लागेल, याचा अंदाजही या रोहिंग्यांना नव्हता, असे संयुक्त राष्ट्राच्या निर्वासित विषयक विभागाने म्हटले आहे.