सातारा – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने क्रेंद्र शासनाच्या “सीएए’ व “एनआरसी’ समर्थनार्थ सातारा शहरातील 300 फूट तिरंगा विराट रॅली काढली. यावेळी देण्यात आलेल्या घोषणांनी रॅली मार्ग दणाणून गेला. रॅलीत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. तर 300 फूट तिरंग्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरी नोंदणी (एनआरसी)च्या समर्थनार्थ काढण्यात येणाऱ्या या रॅलीमध्ये 300 मीटर लांबीचा तिरंगा नागरिकांना प्रेरणा देण्यासाठी हाती घेण्यात आला होता. “सीएए’ या कायद्याविषयीचा गैरसमज दूर व्हावा, या कायद्याविषयी जनजागरण व्हावे, या उद्देशाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने ही रॅली काढण्यात आली. पोवई नाका येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राजपथमार्गे ही रॅली गांधी मैदानापर्यंत काढण्यात आली. या रॅलीतील 300 फुटी झेंड्याने सातारकरांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर या रॅलीचे रूपांतर सभेत झाले. या रॅलीदरम्यान, ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली.
तर “भारत माता की जय, वंदे मातरम्, शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी जय भवानी’ आदी घोषणा देण्यात आल्या. रॅलीत सावकार कॉलेज व यशोदा कॉलेजच्या 800 हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी “अभाविप’चे सहमंत्री नागसेन पुंडके, अमोघ कुलकर्णी, मुकुंद आफळे, अमित कुलकर्णी, नगरसेवक धनंजय जांभळे, सुनेशा शहा, विकास गोसावी, राहुल शिवनामे, सरिता बलशेटवार, रिना भणगे, सुनील कोळेकर, मिलिंद काकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.