पुणे – राज्य शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या साडेआठ कोटी विद्यार्थ्यांची गुणपत्रिका डिजिटल स्वरुपात जतन केली आहे. आता विद्यार्थ्यांना दहावी व बारावीची ई-प्रमाणपत्र बोर्डाच्या संकेतस्थळासह केंद्र सरकारच्या डिजिटल लॉकर या संकेतस्थळावरून उपलब्ध होणार आहे.
राज्य शिक्षण मंडळामार्फत दहावी व बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली जाते. मंडळाच्या दहावी व बारावीच्या 1989 पासून 2019 पर्यंतची गुणपत्रिका व प्रमाणपत्र ऑनलाइनद्वारे उपलब्ध करून देण्याची सुविधा केली आहे. एखाद्या विद्यार्थ्याची गुणपत्रिका अथवा प्रमाणपत्र हरविल्यास त्यास बोर्डाच्या संकेतस्थळावरून ई-प्रमाणपत्र उपलब्ध होत आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. केंद्र सरकारने “डिजिटलायझेन’ला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये सरकारी कागदपत्रांची अधिकृत प्रत म्हणून “डिजि लॉकर’ ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
केंद्र सरकाच्या आयटी विभागाने महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांचे डेटा जतन केलेल्या यंत्रणेचे कौतुक केले. त्यांनीही त्यांच्या डिजि लॉकरमध्ये आता बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी ई-प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुणपत्रिकांचे डिजिटलायझेशन केले आहे.
मंडळाने 1989 पासूनच्या दहावी-बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे या “डिजि लॉकर’मध्ये जतन करून ठेवली आहेत. त्यामध्ये दहावीच्या 5 कोटी 29 लाख तर, बारावीचे 3 कोटी 47 लाख गुणपत्रिका आहेत. तसेच, त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील कोणत्या संस्था अथवा कंपन्यांना बोर्डाच्या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्राची पडताळणी करणे शक्य होणार आहे.
– डॉ. शकुंतला काळे, अध्यक्षा, राज्य शिक्षण मंडळ