नवी दिल्ली : देशात आढळलेल्या 14 हजार 378 करोनाबाधितांपैकी चार हजार 291 बाधीत हे देशाच्या राजधानीत घडलेल्या निजामुद्दीन मरकजशी संबंधित होते. त्यांचे प्रमाण साधारणत: 29.8 टक्के आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिली. गेल्या 24 तासांत 991 बाधित सापडले असून मृतांची संख्या 43 नोंदवली आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 14 हजार 378 असून त्यापैकी 480 जण मरण पावले आहेत. तर एक हजार 992 जणा बाधामुक्त झाले आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले.
केरळच्या केसरगोडमध्ये 168 जण करोना बाधित होते. त्यातील 113 जण बाधामुक्त झाले असून योग्य वैद्यकीय उपचारांमुळे तेथे एकही मृत्यू झाला नाही. अन्य बाधितांवर योग्य लक्ष देण्यात येत आहे. कर्नाटकातील माहे, कोडगू येथे गेल्या 28 दिवसांत एकही नाव बाधित सापडलेला नाही. या शिवाय 23 राज्यांतील अन्य 45 जिल्ह्यात गेल्या 14 दिवसांत एकही नवा बाधित सापडला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दैनिक वार्तालापात ही माहिती दिली.
मृत्यू दर 3.3 %
करोना बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण 3.3 टक्के आहे. त्यात 0 ते 45 वयोगटातील प्रमाण 14.4 टक्के आहे. 45 ते 60 दरम्यान 10.3 टक्के आहे. 60 ते 75 वयोगटातील मृत्यूचे प्रमाण 42.2 टक्के असल्याचे त्यांनी सांगितले.