आगामी काळात तूट भरून काढण्यासाठी विशेष प्रयत्न
संगणक, मॅन्युअल टायपिंगसह इतर परीक्षा रद्द झाल्याचा परिणाम
पुणे – संगणक व मॅन्युअल टायपिंगसह इतर परीक्षा रद्द झाल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला सुमारे 30 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. आगामी काळात ही तूट भरून काढण्यासाठी विशेष प्रयत्न होणार आहेत.
राज्य परीक्षा परिषद ही स्वायत्त संस्था आहे. विविध विभागांच्या परीक्षा घेण्याची सर्व प्रक्रिया परिषदेमार्फत पूर्ण करण्यात येते. विद्यार्थ्यांकडून परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज मागविणे, प्रवेश पत्र पाठविणे, परीक्षा केंद्राची व्यवस्था करणे, प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल जाहीर करणे, गुणपत्रिका वाटप करणे आदी सर्व कामे करण्यात येतात. यासाठी खासगी एजन्सीही नियुक्त केलेल्या असतात.
मार्चपासून राज्यात लॉकडाऊन आहे. सर्व शैक्षणिक संस्था बंद आहेत. त्यामुळे काही परीक्षाही लांबणीवर टाकल्या आहेत. तसेच, काही परीक्षा रद्दच करण्याची वेळ आली. संगणक आणि मॅन्युअल टायपिंग परीक्षेचे जानेवारी ते जून असे सत्रच रद्द केले आहे. शासनमान्य टायपिंग प्रशिक्षण संस्थाच बंद असल्याने उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झालेला नाही. त्यामुळे प्रशिक्षण सत्र रद्द करण्याबरोबरच जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेसाठी सुमारे 2 लाख उमेदवारांनी नोंदणी केली होती. 10 कोटी रुपयांचा फटका परिषदेला बसणार आहे.
शिक्षक पात्रता परीक्षेबाबत (टीईटी) शासनाने काही निर्णय घेतला नाही. त्यामुळे सुमारे 13 कोटी रुपयांचा फटका परिषदेला बसणार आहे. “महाटेट’च्या परीक्षेबाबत शासनाकडे परवानगीचा प्रस्ताव मागेच पाठवला आहे. मात्र, यास अद्याप परवानगी मिळालेली नाही. यामुळे 3 कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता अधिक आहे. विभागीय सेवा प्रवेशोत्तर परीक्षा पुढे ढकलल्या असून यंदा त्या होतील याची शाश्वती नाही. प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एल.एड.) परीक्षा व डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजमधील इयत्ता आठवीची प्रवेश पात्रता परीक्षाही लांबणीवर पडली आहे.
राज्य परीक्षा परिषदेला परीक्षा फी, संस्था नोंदणी, गुणपत्रके, प्रमाणपत्रे शुल्क या माध्यमातूनच पैसा जमा होत असतो. यंदा मात्र परीक्षाच रद्द झाल्याने परिषदेचे आर्थिक नुकसान होणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.