पुणे – यंदाच्या खरीप हंगामानंतर आता कृषी विभागाने आगामी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे.
जिल्हाभरातील कृषी कार्यालयांमधून मागविलेल्या माहितीनुसार रब्बी हंगामाकरिता 29 हजार 400 क्विंटल बियाण्याची गरज असल्याची बाब समोर आली आहे. त्यानुसार हे बियाणे जिल्हाभरातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याच्या हालचाली कृषी आयुक्तालयाने सुरू केल्या आहेत. आयुक्तालयाच्या मंजुरीनंतर शेतकऱ्यांना या बियाणांचे वाटप केले जाणार आहे.
यंदाच्या पावसाळ्यात राज्याचा काही भाग वगळता अन्य भागात समाधानकारक पाऊस पडला आहे. त्यामुळे जमिनीत चांगली ओल असून रब्बी हंगामाकरिता ती पोषक आहे. त्यामुळे यंदाचा रब्बी हंगामात पिकांच्या लागवडीचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे.
जिल्हाभरात रब्बी हंगामातील लागवडीचे तीन लाख, 97 हजार, 505 हेक्टर एवढे क्षेत्र आहे. तर यंदाच्या रब्बी हंगामामध्ये दोन लाख 94 हजार 854 हजार हेक्टरवर लागवडीचे नियोजन केले आहे.