कोल्हापूर (प्रतिनिधी) – कोल्हापूर-सांगली बायपास मार्गावरील जैनापूर (ता. शिरोळ) येथे टेम्पो व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन युवक ठार झाले आहेत. या दुर्घटनेमुळे दानोळी व मजले गावावर शोककळा पसरली आहे.
गुणपाल रोजे (वय 27), सुहास कोठावळे (26, दोघेही रा. मजले, ता. हातकणंगले), अजिंक्य ऊर्फ विपुल रमेश पाटील-रायगोंडा (26, रा. दानोळी) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना रात्री उशिरा घडली आहे. या अपघातानंतर टेम्पोचालक पसार झाला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोल्हापूर-सांगली बायपास रस्त्यावरून टेम्पो (एमएच 13 एएक्स 2682) कोल्हापूरच्या दिशेने जात होता. जैनापूर येथे पोल्ट्री फार्मजवळ दुचाकी (एमएच 09 डीटी 5624) व टेम्पोची धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती, की दुचाकी टेम्पोच्या पुढील भागात घुसली.
या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने गुणपाल रोजे व विपुल पाटील यांचा जागीच मृत्यू झाला; तर कोठावळे यांना गंभीर दुखापत झाली. जखमी कोठावळे याला तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात नेण्यात येत असताना त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचे वृत्त परिसरात वाऱ्यासारखे पसरल्याने जैनापूर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह जयसिंगपूर प्राथमिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. तेथे मृतांच्या नातेवाइकांनी गर्दी केली होती.
रात्री उशिरा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत.