जालना – जालना शहरात एका गुंडाने तीन वर्ष वयाच्या बालकाचे अपहरण करून त्याला कोंडून ठेवले होते. सुमारे दोन महिने सदरचे बालक अपहरणकर्त्यांच्या ताब्यात होते पण पोलिसांनी कारवाई करून या बालकाची सुटका केली असून यातील आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, कार्तिक पवार नावाच्या बालकाचे ताण्या जाधव नावाच्या आरोपीने अपहरण केले होते. त्याच्या विरोधात आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत. कार्तिकच्या आईवडिलांनी ताण्या जाधव याच्याकडून काही पैसे उसने घेतले होते. ते परत देण्यासाठी तो पवार कुटुंबियांना सतत धमकावत असे. पण हे पैसे परत करण्याची त्यांची क्षमता नव्हती.
दोन महिन्यापुर्वी जाधव पुन्हा त्यांच्या घरी पैसे मागायला गेला त्यावेळीही पैसे न मिळाल्याने जाधवने त्यांच्या तीन वर्षाच्या कार्तिक नावाच्या मुलाला पळवून नेले. मुलाच्या आईने धाडस करून पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून बालकाची सुटका केली व जाधवला विविध गुन्ह्यांखाली अटक केली.