नवी दिल्ली : इटलीमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. येथे एकाच दिवशी मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ही जगात आतापर्यंतची सर्वाधिक आहे. इथे दिवसेंदिवस हा आकडा वाढतच चालला आहे. इटलीमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी देशाकडे घरी परतण्यासाठी मदत मागितली होती. इथे अडकलेल्या २६३ विद्यार्थ्यांना एअर इंडियाच्या विशेष विमानाने रविवारी सकाळी भारतात परत आणण्यात आले.
The special Air India flight carrying 263 Indian students that took off from Rome has landed at Delhi airport. #Coronavirus pic.twitter.com/ccyykMlJ9L
— ANI (@ANI) March 22, 2020
शनिवारी संध्याकाळी रोममधून एअर इंडियाचे विशेष विमान भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन निघाले. सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान उतरले. प्रत्येक विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
या विद्यार्थ्यांना पुढील १४ दिवस दिल्लीत विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. तिथे त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे. यापूर्वी भारताने इटलीतून २१८ भारतीय नागरिकांना परत आणले होते. यात बहुतांश विद्यार्थीच होते. कोरोनाचा पूर्ण विळखा इटलीला बसला आहे, हा देश पूर्णपणे लॉकडाऊन असून इथे दिवसाला मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा वाढतच चालला आहे.