श्रीनगर – जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या जिल्हा विकास परिषदांच्या निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या तीन नेत्यांनी आज पक्षाचा राजीनामा दिला. “पीडीपी’ म्हणजे “नॅशनल कॉन्फरन्स’चीच दुसरी आवृत्ती बनली आहे, अशी टीका धमन भसीन, फलाइल सिंग आणि प्रितम कोतवाल या नेत्यांनी केली आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
नॅशनल कॉन्फरन्सच्या भ्रष्ट आणि घराणेशाहीच्या राजकारणाला धर्मनिरपेक्ष पर्याय म्हणून मुफ्ती मोहंम्मद सैद यांनी “पीडीपी’ची स्थापना केली होती. पक्षाच्या स्थापनेपासून आपण पक्षाबरोबर आहोत. मात्र दुर्दैवाने पक्षाच्या नेतृत्वाने मुफ्ती यांचा अजेंडा सोडून दिला आहे आणि हा पक्ष आता नॅशनल कॉन्फरन्सचा “बी टीम’ बनला आहे.
एवढेच नव्हे तर पक्ष नेतृत्वाने अलिकडच्या काळात पक्षाच्या संस्थापकांच्या मूल्याविरोधात अत्यंत प्रक्षोभक आणि वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत, असा आरोप या तीन नेत्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये केला आहे. मुफ्ती मोहंम्मद सैद यांचे शिष्य असल्याने या वातावरणात काम करणे आपल्यासाठी अशक्य बनले आहे, असेही या नेत्यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी पीडीपीचे ज्येष्ठ नेते मुझफ्फर हुसैन बेग यांनीही पक्षनेतृत्वावर टीका करून राजीनामा दिला होता. जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यावरून “जोपर्यंत जम्मू काश्मीरचा ध्वज प्रत येत नाही तोपर्यंत तिरंगा हातात धरणार नाही.’ असे वक्तव्य मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर टीका करताना केले होते.