अकोले -अकोले तालुक्यात चौथा रूग्ण सापडल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. त्याच रुग्णाच्या संपर्कात आलेल्या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सहा करोनाग्रस्त रुग्ण अकोले तालुक्याच्या नावावर खतावले गेले आहेत. अर्थात हे अकोले तालुक्यातील रहिवासी असले तरी ते मुंबईहून आले आहेत. दरम्यान अकोलेत दि. 29 मे पर्यंत वैद्यकीय सेवा, मेडिकल सेवा व पेट्रोल पंप वगळता सर्व व्यवहार बंद राहणार? असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पिंपळगाव खांड येथे घाटकोपरवरून (मुंबई) आलेली 68 वर्षीय महिला पिंपळगाव खांड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्वारंटाईन करण्यात आली होती. दोन दिवसांपासून तिची तब्येत अचानक खालावल्याने तिची तपासणी करण्यात आली.तिच्या संपर्कात आलेल्या आणखी दोन व्यक्तींना नगरला दाखल केले होते. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून आलेल्या अहवालानुसार ती पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.
इतरही पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. त्यामुळे अकोले तालुक्यात करोनाचे 6 रुग्ण झाले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजित गंभीरे यांनी दिली. पाहुणे 6 पॉझिटिव्ह करोना रुग्ण आढळल्याने गेल्या दोन महिन्यापासून प्रशासनाने राबवलेली मोहीम बाहेरून फोल ठरली आहे. बाहेरून आलेल्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर करोनाचा प्रभाव दिसून येत आहे. अजूनही अकोले
तालुक्यात मुंबई-पुणे-नाशिक यासह अनेक भागातून नागरीक ये जा करताना दिसत आहेत.
राजूर गाव 28 मे ते 1 जून या पाच दिवसांसाठी पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आले आहे.पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील व ग्रामपंचायतचे सरपंच गणपतराव देशमुख यांनी प्रथम पासूनच या गावांमध्ये करडी नजर ठेवून स्वतः गावांमध्ये व पंचक्रोशीत करून बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर कडक नजर ठेवली. पण समशेरपूर रुग्णाच्या संपर्कात आलेली व्यक्ती राजूर गावात फिरल्याने हा निर्णय घेतला गेला आहे. दुसरीकडे कोतूळ जवळील पिंपळगाव खांड या गावात करोनाचे तीन रुग्ण सापडल्याने कोतूळकरांचे धाबे दणाणले असून खबरदारीचा उपाय म्हणून कोतूळ ग्रामपंचायतच्या वतीनेही 28 मे ते 1 जूनपर्यंत संपूर्ण गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला व त्याची तातडीने काल दुपारी 2 पासून सुरवात करण्यात आली.अशी माहिती सरपंच अनुसया धराडे यांनी दिली. या कालावधीत कोणीही घराबाहेर पडू नये.तर बाहेर गावावरून आलेल्या व्यक्तींना सक्तीने विलगीकरण कक्षात ठेवण्याचा निर्णय झाला असल्याचे त्यांनी सांगितले.