रायगड – रायगड जिल्ह्यातील घोनसे घाटात ठाणे ते श्रीवर्धन अशा प्रवास करणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. सदर बस सकाळी आठच्या सुमारास पन्नास ते साठ फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू, तर 20 जण जखमी झाले आहेत. सदर बसचा अपघात झाला असता मदतीसाठी घटनास्थळी प्रशासनाने धाव घेतली आहे.
नालासोपारावरून एक खासगी प्रवासी बस श्रीवर्धनकडे निघाली होती. या बसला घोणसे घाटात आली असता पुलावरुन थेट 60 ते 70 फूट खाली कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार ठाणे येथून काही जण श्रीवर्धन येथील गावी एका कार्यक्रमासाठी निघाले असताना बसचा अपघात झाला. म्हसळा तालुक्यातील धनगर मलई परिसरातील ठाण्याला राहणारे नागरिक आपल्या गावाला एका कार्यक्रमासाठी म्हसळा येथे येत असताना हा अपघात झाला. सध्या मदतकार्य सुरु आहे.
दरम्यान, पालकमंत्री आदिती तटकरे यांनीही तातडीने अपघातग्रस्तांची भेट घेतली असून अपघातग्रस्तांना आवश्यक उपचार देण्याविषयी आरोग्य यंत्रणेला निर्देश दिले आहेत. दरम्यान मृतांची ओळख पटवण्याबाबतचा तपास सुरु करण्यात आला आहे.