काल विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. यावेळी शिंदे सरकारने आपले बहुमत सिद्ध केले. त्यानंतर सभागृहात झालेल्या भाषणांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार शाब्दिक फटकेबाजी केली. एवढी वर्ष मनात साचलेली शिवसेनेबाबतची खदखद व्यक्त करताना शिंदे यांनी आणखी ३-४ आमदार आपल्यासोबत येणार असल्याचा गौप्यस्फोट केला.
पक्षातील आमदारांवर अन्याय होत होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, अन्यायाविरुद्ध उठाव केला पाहिजे मी देखील तोच उठाव केला असल्याचे शिंदे यांनी यावेळी ठणकावून सांगितले. सगळे झोपायचे तेव्हा मी देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जायचो आणि सगळे उठण्याच्या आधीच परत यायचो, हा कार्यक्रम एका दिवसात झालेला नसल्याचं देखील शिंदे यांनी सभागृहात स्पष्ट केलं.
आणखी तीन-चार आमदार येणार असल्याचा गौप्यस्फोट शिंदे यांनी यावेळी केला. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात केवळ १५ आमदार उरले असताना त्यातील आणखी तीनचार आमदार आपल्यासोबत येतील, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की संतोष बांगर काल रात्री माझ्याकडे आले. आणखी तीन चार जण यायला तयार आहेत, असे त्यांनी मला सांगितले. मी कोणालाही जबरदस्तीने, बंदूक लावून आणले नसल्याचे देखील शिंदे यांनी स्पष्ट केले.
सामनातून फडणवीसांना टोला
फडणवीसांनी सभागृहात बहुमत चाचणी झाल्यानंतर सर्वांचे आभार मानले त्यावर सामानातून शिवसेनेने भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत चाचणी यशस्वी करणाऱ्या अदृश्य शक्तींचे आभार मानले होते. शिंदे हे किती मजबूत, महान नेते आहेत यावर त्यांनी भाष्य केले. पण फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापासून रोखणारी अदृश्य शक्ती कोण ? हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे, असा टोला शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावलाय.