नवी दिल्ली – युपीए सरकारच्या काळात झालेल्या कथित 2 जी घोटाळा प्रकरणात माजी दूरसंचार मंत्री ए राजा आणि अन्य आरोपींना कोर्टाने निर्दोष मुक्त केले आहे. तसेच हा घोटाळाच नव्हता असा निर्वाळाही कोर्टाने दिला आहे.
या निकालाला सीबीआयने दिल्ली हायकोर्टात आव्हान दिले असून त्यावरील सुनावणी जानेवारी महिन्यात होणार आहे. 13 ते 15 जानेवारी या कालावधीत ही सुनावणी होणार आहे. 2 जी प्रकरणात ईडी मार्फत मनि लॉड्रिंगची केसही संबंधीत आरोपींवर लावण्यात आली होती त्याही प्रकरणात कोर्टाने आरोपींना निर्दोष मुक्त केलेले आहे.
तथापि मोदी सरकारने या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यास अनुमती दिल्यानंतर आता हे प्रकरण नव्याने उपस्थित होत आहे. विशेष न्यायालयाने 21 डिसेंबर 2017 रोजी ए राजा आणि अन्य आरोपींना निर्दोष सोडण्याचा निर्णय दिला होता. द्रमुक पक्षाच्या खासदार कनिमोळी याही या प्रकरणातील आरोपी होत्या पण त्यांचीही निर्दोष सुटका झाली आहे.
तत्कालिन दूरसंचार सचिव सिद्धार्थ बेहुरा, ए राजा यांचे तत्कालिन खासगी सचिव आर. के. चंडोलिया, युनिटेक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय चंद्रा, आणि अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीचे तीन वरीष्ठ अधिकारी या प्रकरणातील आरोपी होते.