नगर जिल्ह्याला एकूण 431 कोटी रूपये प्राप्त
नगर – राज्यांमध्ये माहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या महा चक्रीवादळामुळे तसेच अवेळी पावसामुळे राज्यातील 34 जिल्ह्यातील 325 तालुक्यांमधील शेतपिकांच्या नुकसान पोटी राज्य शासनाने मदत जाहीर केली आहे. यामध्ये नगर जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात 135 कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते.आता पुन्हा जवळपास एक महिन्याच्या कालावधीनंतर 296 कोटी रूपये प्राप्त झाले आहेत.त्याचे वाटप सांख्यिकी क्रमानुसार गावनिहाय तातडीने करण्यात येणार आहे.
सदर तहसीलदारांनी ते संबंधीत शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने वर्ग करावेत असे आदेश जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी दिले आहेत. जिल्ह्याला एकूण 431 कोटी रूपये मिळाले आहेत. राज्यामध्ये अवेळी झालेल्या पावसामुळे नगर जिल्ह्यामध्ये मोठे नुकसान झाले होते. साधारणत तीन लाख 71 हजार हेक्टरवर नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते .प्रशासनाने तसेच तलाठी व महसूल यंत्रणेने तसेच कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे केले होते.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर एकत्रित अहवाल हा राज्य शासनाकडे पाठवला होता. राज्य शासनाने नुकसान झालेल्या गावांना मदत देण्याचा निर्णय घेऊन मदत जाहीर केली आहे .नगर जिल्ह्यामध्ये साधारणत 475 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये फळपिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.शासनाने मदतीचे निकष बदलल्याने 475 ऐवजी 449 कोटी मदत जिल्ह्याला मिळणार होती.आता 431 कोटी प्राप्त झाले आहेत.
पहिल्या टप्प्यातील 131 कोटी रुपयांच्या अनुदानाचे वाटप होऊन महिना होत आला मात्र तरीही दुसऱ्या टप्प्याचे अनुदान प्राप्त झाले नव्हते. मध्यंतरी सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेत वेळ गेल्याने हे अनुदान रखडले गेल्याचे बोलले जात होते. ते आता दोन दिवसापूर्वी शासनाने अध्यादेश काढून वर्ग केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने ते तहसीलदारांना शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. पहिल्या टप्प्यातील अनुदानाच्या वितरण अनुभवामुळे दुसऱ्या टप्प्यातील अनुदान वितरणास कोणत्याही अडचणी येणार नाहीत असा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.