पुणे -पुणे, पिंपरी-चिंचवडमधील काही भाग ज्या पद्धतीने करोनाचा हॉटस्पॉट ठरले आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागत मुंबई, पुणे शहरातून येणाऱ्यांमुळे करोनाचा फैलाव होत असल्याने ग्रीन झोनमध्ये असलेले तालुके आता रेड झोनमध्ये येऊ लागले आहेत. जिल्ह्यातील 13 ही तालुक्यांमध्ये आतपर्यंत 293 रुग्ण आढळून आले आहेत. यातील 11 जणांचा मृत्यू तर 134 करोनामुक्त झाले असून 148 रुग्णांवर उपचार (ऍक्टिव्ह) सुरू आहेत.
तब्बल दोन महिने करोनामुक्त राहिलेल्या तालुक्यांमध्ये चौथ्या टप्प्यांतील लॉकडाऊन शिथिल केले व लॉकडाऊनमध्ये आडकून पडलेल्यांना आपल्या गावी जाण्याची मूभा सरकारने दिल्याने ग्रामीण भागांत करोनाचा रुग्णांचा शिरकाव होत असून त्यांचा आकडाही वाढ असल्याने ही वाढ चिंताजनक म्हणावी लागेल. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत आढळलेले बहुतांश रुग्ण हे मुंबईमधील विविध भागांमधून आलेले असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे मुंबईचे करोना कनेक्शन सिद्ध होत आहे.
परगावावरून जर आपण आपल्या गावी जात असला तर गावातील शाळेत आपल्याला 14 दिवस राहावे लागणार आहे. यासाठी प्रत्येक गावांत शाळेमध्ये सगळी व्यवस्था केली आहे. त्यानुसार अनेक जण त्याचे पालन करीत आहेत. काही गावातील क्वारंटाइन व्यक्ती काही दिवसांनी करोना पॉझिटिव्ह आढळून आले असून ते गावात कोण्याच्याही संपर्कात आले नसल्याने त्या गावात घाबरून जाण्याचे कारण नाही. त्यामुळे गावी या पण 14 दिवस क्वारंटाइन व्हा अन् नंतर निधड्या छातीने गावात वारर करा असे म्हणण्याची वेळ
आली आहे.
लपून छपून येणारे…
सरकारने आपल्या मुळ गावी जाण्यासाठी काही अटी व शर्थी लागू केल्या आहेत. पण या अटी व शर्थी सर्रासपणे मोडून अनेक जण रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत लपूनछपून गावी आले आहेत. तर आपला नातलग किंवा भाऊबंध असल्याने समाजात व गावात आपली थू-थू होईल या भीतीने अनेकांनी परगावरून आलेल्यांची माहिती लपवल्याने ग्रामीण भागात करोना झपाट्याने आपले पाय पसरत आहे. त्यामुळे “शिकलेले ही आडणी’ झाले असल्याचे भासवत असून ही मोठी धोक्याची घंटा आहे.