नवी दिल्ली – करोना महामारीमुळे रेल्वेखात्याचे 2903 कर्मचारी आत्तापर्यंत दगावले आहेत अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली. यातील 2782 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या सेटलमेंटची रक्कम अदा करण्यात आली आहे असेही मंत्र्यांनी सांगितले.
सेवेत असताना मरण पावलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना अनुकंपा तत्वावर सरकारी सेवेत घेतले जाते ते तत्व रेल्वेतही लागू असून करोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तिच्या कुटुंबियांनाहीं त्यांच्या योग्यतेनुसार या योजनेचा लाभ देऊन त्यांनाहीं नोकरी देण्यात येईल असेही अश्विनीकुमार यांनी सांगितले.
त्यांनी नमूद केले की करोनामुळे जे 2903 कर्मचारी दगावले आहेत त्यापैकी 1732 मृतांच्या वारसांना रेल्वेत नोकरी दिली गेली आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये लसीकरणाच्या कामात झालेल्या प्रगती बाबत माहिती देताना यावेळी सरकारकडून सांगण्यात आले की रेल्वेच्या 8 लाख 63 हजार 868 कर्मचाऱ्यांना करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला असून एकूण 2 लाख 34 हजार 184 कर्मचाऱ्यांना दोन्ही डोस देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे असेही त्यांनी सांगितले.