ठाणे : ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातून वर्षभरात 800 मुलांचे अपहरण झाले होते. त्यापैकी 29 टक्के मुलांचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आले, अशी माहिती पोलिसांनी निवेदनात दिली.
13 नोव्हेंबर 2019 पर्यंत ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातून 803 मुलांचे अपहरण झाल्याचे गुन्हे नोंदवण्यात आले. त्यापैकी 29 टक्के म्हणजे 233 मुलांचा शोध लागू शकला नाही. बाल दिनाच्या पार्श्वभूमीवर मुलांची काळजी घ्यावी, या हेतूने पोलिसांनी एक निवेदन जारी केले. त्यात ही माहिती देण्यात आली.
2018 मध्ये एक हजार 25 मुलांचे अपहरण करण्यात आले होते. त्यापैकी 901 मुलांचा शोध घेण्यात आला होता. तर या दोन वर्षात अपहरण झालेल्या मुलांमध्ये एक हजार 190 मुली होत्या. मुलांची पिळवणूक आणि त्यांच्या हक्काच्या रक्षणासाठी एक आठवड्याची विशेष मोहीम ठाणे पोलिसांच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. त्याची सुरवातही 14 तारखेपासून करण्यात आली.