तर भारतीय तुरूंगांत 366 पाकिस्तानी
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानने बुधवारी एकमेकांचे नागरिक असणाऱ्या कैद्यांच्या याद्यांची देवाणघेवाण केली. त्यानुसार, सध्या पाकिस्तानी तुरूंगांमध्ये 282 कैदी आहेत.
पाकिस्तानात तुरूंगवास भोगत असलेल्या भारतीयांमध्ये 55 नागरिकांचा आणि 227 मच्छिमारांचा समावेश आहे. तर, भारतीय तुरूंगांमध्ये 366 पाकिस्तानी कैदी आहेत. त्यामध्ये पाकिस्तानच्या 267 नागरिकांचा आणि 99 मच्छिमारांचा समावेश आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये 2008 या वर्षी एक करार झाला. त्या करारानुसार दरवर्षी 1 जानेवारीला आणि 1 जुलैला दोन्ही देश कैद्यांच्या याद्यांची देवघेव करतात. दरम्यान, भारतीय कैद्यांची तातडीने सुटका करून त्यांना स्वदेशी पाठवण्याची सूचना भारताकडून पाकिस्तानला करण्यात आली.
बेपत्ता असणारे काही भारतीय सुरक्षाजवान पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचा संशय आहे. त्यांनाही स्वदेशी पाठवण्याची मागणी भारताने केली आहे. भारतीय मच्छिमारांना अटक करण्याच्या आगळिकी पाकिस्तानकडून सातत्याने केल्या जातात. भारतीय मच्छिमारांनी आमच्या सागरी हद्दीत शिरकाव केल्याचा कांगावा तो देश करत असतो. भारतीय मच्छिमारांच्या नौकाही पाकिस्तानकडून जप्त केल्या जातात.