पुणे- मास्क न वापरता घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. दि.2 ते 10 सप्टेंबर या नऊ दिवसांत 27 हजार 989 नागरिकांकडून एक कोटी 40 लाख रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल करण्यात आला आहे.
अनलॉक सुरू झाल्यानंतर करोनाचा प्रसार अधिक होऊ नये, यासाठी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत आणि स्थानिक पोलिसांना या कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. मास्क न वापरता जाणारे पादचारी, दुचाकी-चारचाकीद्वारे प्रवास करणाऱ्यांकडून पाचशे रुपये दंड घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
दि. 2 सप्टेंबरपासून पुणे शहरात ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. दि. 8 सप्टेंबरपर्यंत पोलिसांनी 15 हजार 206 जणांवर ही कारवाई करून त्यांच्याकडून 73 लाख 3 हजार रुपयांचा दंड वसूल केला होता. तर केवळ एका दिवसातच हा आकडा एक कोटीच्या घरात पोहोचला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
घराबाहेर पडताना नागरिकांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. या आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून 500 रुपये दंड घेतला जात आहे.
– बच्चन सिंग, पोलीस उपायुक्त, गुन्हे