श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून सैन्याचा अतिरिक्त ताफा तैनात करण्यात येत असल्याने इथल्या नागरिकांसह राजकीय नेत्यांमध्ये अनेक चर्चा सुरू आहेत. त्यातच आता काश्मीर खोऱ्यात सुरक्षा यंत्रणेच्या 280 अतिरिक्त तुकड्या म्हणजेच 28 हजार जवान तैनात केल्या आहेत. श्रीनगरमधील अतिसंवेदनशील परिसरात भारतीय जवान तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये सीआरपीएफच्या जवानांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.
गुरुवारी रात्री अचानक काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा कडक करण्यात आली आहे. जवानांच्या 280 तुकड्या कोणतेही कारण नसताना या परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत. शहरात प्रवेश करण्यापासून ते बाहेर जाण्याच्या सर्व रस्त्यांवर सीआरपीएफचे जवान बंदोबस्त करत आहेत. स्थानिकांनी ही परिस्थिती पाहून आवश्यक लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, यापुर्वी काश्मीरमध्ये 10 हजार अतिरिक्त सैन्य पाठवण्यात आले होते त्यात आता आणखी 28 हजार सैन्याची भर पडल्याने परिसरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.