नवी दिल्ली: भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून दहशतवादी तळ पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. यासोबतच 7 लॉंचपॅड तयार करण्यात आले असून त्यावर 275 दहशतवादी सक्रिय झाले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.
याव्यतिरिक्त जम्मू-काश्मीरमधील शांतता भंग करण्यासाठी अफगाण आणि पश्तून सैनिकही तैनात करण्यात येत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. पुढील महिन्यात दहशतवादी कारवायांवर नजर ठेवणारी फायनान्शिअल ऍक्शन टास्क फोर्स पाकिस्तानच्या भवितव्यावर निर्णय घेणार आहे. अशाच परिस्थितीत पाकिस्तानकडून कुरापती सुरू आहेत.
यापूर्वीही 1990 च्या दशकात पाकिस्तानने काश्मीरमध्ये हिंसा भडकावण्यासाठी आणि दहशतवाद पसरवण्यासाठी अशा प्रकारे दहशतवाद्यांचा वापर केला होता. भारताविरोधात काश्मीर खोऱ्यात प्रॉक्सी वॉरदरम्यान पाकिस्तानने हा डाव खेळला होता. भारताने जेव्हा दशतवादाविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली तेव्हा पाकिस्तानने आपली रणनीती बदलली. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय मिळून भारताविरोधात कारवाया करण्यासाठी संपूर्ण ताकद लावत आहेत. नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तान दहशतवाद्यांना तयार करत आहे. तसेच लॉंचपॅडही उभारण्यात येत आहे. दहशतवादी काश्मीरमधील गुरेज सेक्टरमधून भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहितीही समोर आली आहे.