डिझेलची कमतरता ः विद्यार्थी व नोकरदारांचे आंदोलन
रत्नागिरी : रत्नागिरीच्या एसटी आगारातील आज डिझेलअभावी 270 फेऱ्या रद्द करण्यात आला. यामुळे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नोकरदारांचे हाल झाले. गेले काही महिने अपुरे डिझेल, तेल कंपन्यांची थकबाकी, तसेच कर्मचाऱ्यांची पगारकपात इत्यादी विविध कारणांमुळे रत्नागिरी आगाराविषयीची मोठी चर्चा सुरु होती. त्यातच आज अनेक गाड्या रद्द झाल्याने या चर्चेत आणखी भर पडली. या गोंधळामुळे प्रवाशांनी मात्र तीव्र संताप व्यक्त केला.
एसटी आगारात काल (18 डिसेंबर) रात्री डिझेलचा टॅंकर दाखल झाला. मात्र त्यातील डिझेल उतरवून घेण्यात आले नाही. नियमानुसार रात्री टॅंकरमधून डिझेल उतरवून घेतले जात नाही. त्यामुळे डिझेल उतरवले गेले नाही. आगारात असलेला साठा संपल्यामुळे एसटीच्या अनेक गाड्यांना आज डिझेलचा पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील 136 आणि शहरी विभागातील 134 अशा 270 फेऱ्या आज रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे एसटीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आणि प्रवाशांनाही हाल सोसावे लागले.
मागील महिन्यातही म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी एसटी आगारात असाच प्रकार घडला होता. डिझेल पुरवठाच न झाल्याने 439 फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की एसटी विभागावर ओढावली होती. आता महिन्याभरातच एसटी डेपोमध्ये डिझेलअभावी फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे.