लातूर विभागातील शाळांचाच अधिक समावेश
पुणे – राज्य मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत राज्यातील 27 शाळांचा निकाल शून्य टक्के तर 8 हजार 360 शाळांचा निकाल 100 टक्के एवढा लागला आहे.
परीक्षेत काही शाळांचा निकाल हा चांगला तर काही शाळांचा निकाल हा खूपच कमी लागत असतो ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. राज्यात सर्वाधिक लातूर विभागातील 9 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. कोकण विभागात मात्र या निकालाची एकही शाळा आढळून आलेली नाही. 100 टक्के निकालात सर्वाधित शाळा या मुंबई विभागात 1 हजार 714 तर सर्वात कमी कोकण विभागात 443 एवढ्या आहेत.
राज्यातील 10 ते 20 टक्के दरम्यान 4 शाळा, 20 ते 30 टक्के दरम्यान 19, 30 ते 40 टक्केच्या 34, 40 ते 50 टक्के दरम्यान 86, 50 ते 60 टक्के दरम्यान 154, 60 ते 70 टक्केच्या 327, 70 ते 80 टक्केच्या 888, 80 ते 90 टक्केच्या 2813 या प्रमाणे शाळा आढळल्या आहेत.
राज्यात कॉपीची 589 प्रकरणे…
राज्यात यंदाच्या परीक्षेतही कॉपीसारख्या गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संख्या अधिक आहे. राज्यातील नऊ विभागात एकूण 589 कॉपीची प्रकरणे आढळली होती. यात 16 प्रकरणे ही तोतयागिरीची होती. औरंगाबादमध्ये सर्वाधिक 185 प्रकरणे आढळली आहेत. कोकण विभागात एकही कॉपीचे प्रकरणे सापडले नाही हे विशेष आहे. पुणे विभागात 39, नागपूरमध्ये 87, मुंबईमध्ये 11, कोल्हापूरमध्ये 43, अमरावतीत 62, नाशिकमध्ये 63, लातूरमध्ये 99 याप्रमाणे कॉपीची प्रकरणे सापडली आहेत.
7 हजार 844 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण…
राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल हा 92.73 टक्के एवढा लागला आहे. एकूण 8 हजार 522 दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील 8 हजार 459 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील 7 हजार 844 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यात अंधत्व असलेले 1 हजार 143, कर्णबधिर 1 हजार 438, अपंगत्व असलेले 1 हजार 669, विशिष्ट शिक्षणाच्या 1 हजार 561 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.