इस्लामाबाद :मुंबईवर 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पूर्वतयारीमध्ये सहभागी असलेल्या अब्दुल सलाम भट्टावी या लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याचा पाकिस्तानातील तुरुंगात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
26-11 चा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना “शहिद’ संबोधून तो भाषणे देत असायचा. लष्कर ए तोयबाचा म्होरक्या असलेल्या अब्दुल सलाम भट्टावीने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची पूर्वतयारी करण्यासही मदत केली होती. त्याला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले होते. “टेरर फायनान्सिंग’च्या आरोपाखाली त्याला आणि हाफिज सईदचा मेव्हणा अब्दुल रेहमान मक्की यालाही ऑगस्ट 2020 मध्ये
दोषी ठरवण्यात आले होते. भट्टावी याला साडे 16 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. हाफिज सईदला पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी अटक केली होती, तेंव्हा 2002 आणि 2008 मध्ये लष्कर ए तोयबाचे हंगामी नेतृत्वदेखील भट्टावीकडे होते.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातल्या शेखपुरा भागातल्या तुरुंगात हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे लष्कर ए तोयबाशी संबंधित अन्य काही गटांनी सोमवारी रात्री जाहीर केले. लष्कर ए तोयबाशी संबंधित एका गटाने भट्टावीच्या दफनविधीचा एक व्हिडीओ देखील प्रसिद्ध केला आहे. भट्टावीच्या मृत्यूच्या वृत्ताला भारतीय गुप्तचर यंत्रणांनीही दुजोरा दिला आहे. मात्र त्याच्या मृत्यूचा अधिक तपशील उपलब्ध झाला नसल्याचेही भारतीय यंत्रणांनी म्हटले आहे.