सातारा – भूस्खलनाच्या भीतीने सातारा- सज्जनगड मार्गावरील मोरेवाडी गावातील अडीचशे नागरिकांचे तातडीने स्थलांतर करण्यात आले आहे. गावाच्या पूर्व भागातील जमीन भेग पडून तब्बल अकरा फूट खचल्याने गावकरी प्रचंड धास्तावले आहेत. जिल्हा प्रशासनाने तातडीने आपत्ती निवारणाचे काम हाती घेऊन ठोसेघर व घाटेवाडी या गावांत स्थलांतर झालेल्या कुटुंबाना मदतकार्य सुरू ठेवले आहे. या माहितीला सातारा तहसीलदार आशा होळकर यांनी दुजोरा दिला. सातारा शहरापासून नऊ किलोमीटरवर सज्जनगडाच्या कुशीत डोंगरात वसलेल्या मोरेवाडी गावात साठ कुटुंबातील अडीचशे गावकरी पिढ्यान्पिढया नांदत आहेत. 1976 व 2005 च्या महापुरावेळीही असा काही प्रकार घडला नसल्याचे गावकरी सांगतात.
गावाची भौगोलिक रचना सपाटीची व उतरंडीची असल्याने घरांच्या रचनेमध्ये सलगता नाही. तब्बल दोन आठवडे सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सातारा तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. साधारण आठ दिवसांपूर्वी पावसाने जोर पकडल्यानंतर गायरान माळाच्या पूर्वेला जमिनीला मोठी भेग पडल्याचे काही गावकऱ्यांच्या लक्षात आले. तेव्हापासूनच भीतीची टांगती तलवार आमच्या डोक्यावर होती याची माहिती गावचे पोलिस पाटील सुनील मोरे यांनी दिली. गेल्या तीन दिवसांत भेग पडलेल्या परिसरात जमिनीतून पाण्याचे उमाळे वाढल्याने डोंगर उताराचा भाग एका बाजूला दहा फूट खचला. गावकऱ्यांचा तणाव वाढला.
भूस्खलनाची माहिती समजताच साताऱ्याच्या तहसीलदार आशा होळकर यांनी यंत्रणेसह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तेथील 250 नागरिक लगतच्या घाटेवाडी गावातील शाळेत हलवण्यात आल्याची माहिती आशा होळकर यांनी दिली. तेथे गावकऱ्यांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मंडलाधिकारी व तलाठी यांच्यासह महसूल यंत्रणेला मोरेवाडीच्या खचणाऱ्या जमिनीवर युद्धपातळीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना आशा होळकर यांनी दिल्या आहेत. मोरेवाडी भूस्खलनाच्या क्षेत्राच्या लगत गावाच्या पाण्याची टाकी व शाळा परिसर असल्याने येथील ग्रामस्थ प्रचंड धास्तावले आहेत. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सुध्दा या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे.