मुंबई : साईबाबांच्या जन्मस्थळावरुन पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. रविवारपासून शिर्डीत बंद पुकारण्यात आला आहे. साईबाबांच्या जन्मस्थळाच्या नामोल्लेखावरून शिर्डी ग्रामस्थांनी घेतलेल्या भूमिकेला समर्थन देत शिर्डी परिसरातील 25 गावांनी येत्या बेमुदत शिर्डी बंदला जाहीर पाठिंबा दिला आहे. या आंदोलनात सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने आता जन्मस्थळाच्या उल्लेखाला होणारा विरोध आणखी तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे.
जोपर्यंत पाथरीचा साईबाबांचे जन्मस्थान असा उल्लेख मागे घेतला जात नाही, तोपर्यंत शिर्डीचे आंदोलन थांबणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी येथील असल्याचा तेथील ग्रामस्थ दावा करतात. गेल्या काही वर्षांपासून हा वाद सुरु आहे. शिर्डी परिसरातील राहाता, अस्तगाव, पुणतांबा, डोऱ्हाळे, एकरूखे, शिंगवे, नांदुर्खी, सावळीविहीर, निघोज, निमगाव, वडझरी,पिंपळस, साकुरीसह गावातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी शिर्डीच्या ग्रामस्थांची भेट घेत त्यांच्या भूमिकेस पाठिंबा दिला व बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी येथे साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख केला होता. तसेच 100 कोटी रुपयांच्या विकासनिधीचीही घोषणा केली होती. त्यानंतर हा वाद पुन्हा उफाळून आला होता. तत्पूर्वी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही पाथरीचा उल्लेख साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून केला होता. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला होता.