परप्रांतीयांबरोबरच विदर्भ आणि मराठवाड्यातील व्यक्तींची संख्या अधिक
पुणे – पुणे शहर व जिल्हा कार्यक्षेत्रातील दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट, बार,पब, आयटी कंपन्या, शाळा-महाविद्यालये, मॉल सिनेमागृहे, बाजारपेठा, शॉपिंग कॉम्पलेक्स बंद ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. हे सर्व 31 तारखेपर्यंत बंद असणार आहे. या पार्श्वभूमीवर येथे कार्यरत असणाऱ्या सुरक्षारक्षकांनी गावचा रस्ता धरला आहे. शहर व जिल्ह्यात जवळपास 50 ते 55 हजार सुरक्षारक्षक आहेत. यामध्ये परप्रांताबरोबरच विदर्भ आणि मराठवाड्यातील व्यक्तींची संख्या अधिक आहे. मात्र, एटीएम, बॅंका आणि गृह सोसायट्यांचे सुरक्षारक्षक 24 तास ऑनड्युटी आहेत.
पुणे जिल्हा व शहर कार्यक्षेत्रात खासगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम व धार्मिक सण-उत्सव, क्रीडा स्पर्धा, आठवडे बाजार आदीला मनाई केली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले. करोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी या अत्यावश्यक उपाययोजना सुरू आहेत.
गृहनिर्माण हौसिंग सोसायटी, खासगी बंगले, बॅंक- ए.टी.एम, शासकीय निमशासकीय संस्था, सरकारी कार्यालय, हॉस्पिटल आदी ठिकाणी कामाला असलेले सुरक्षारक्षक कर्तव्यावर दिसत आहेत. परंतु, जिथे जिथे विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही ठिकाणी बंद केला आहे. तेथील, सर्व असंघटीत कामगार गावाला निघाले आहेत.
यात मराठवाडा, विदर्भ, खानदेश व उत्तर भारतातील काही राज्यांतून शहरात आलेले जवळपास 50 ते 55 हजार सुरक्षारक्षक काम करतात. आजाराचे संक्रमण होऊ नये या भीतीपोटी असंघटीत कामगार व सुरक्षारक्षकांचे लोंढेच्या लोंढे गावी जात आहेत. त्यात पोलीस प्रशासनाचा ताण आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
22 हजार कर्मचाऱ्यांकडून जनजागृती
पुणे शहरातील पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशीप प्रोग्रॅम (पी-4) यांच्या कार्यालयाशी संपर्क केला असता त्यांच्या वतीने सांगण्यात आले कि, आमचे जवळपास 22 हजार कर्मचारी करोना विषयक जागृती करत आहेत. त्यांना सुरक्षेच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले आहे. ते 30 पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत कर्तव्यावर असतील. त्यात पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशीप प्रोग्रॅम (पी-4) मधील अधिकृत मालकांच्या अधिपत्याखाली कर्तव्यावर असलेल्या ठिकाणी जनजागृती करून माहिती देतील. गर्दीचे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, विशेष सुरक्षा पुरविण्याच्या कामी आम्ही मदत करीत आहे. तसेच, अफवांवर विश्वास ठेवू नये यासाठी आम्ही जनतेची सेवा म्हणून करत आहोत, आपण एक आदर्श नागरिक म्हणून आम्ही सहभाग वाढवला असल्याचे सांगितले.