पुणे – करोना आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील शाळा पूर्णपणे बंद आहेत. अशा वेळी प्रत्यक्ष शाळा कधी सुरू होणार हे नक्की नाही. तर, शैक्षणिक वर्ष दि. 15 जूनपासून सुरू झाले, पण अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा याची चिंता शिक्षक आणि विद्यार्थ्यांना होती. यातच राज्य शिक्षण मंडळाच्या पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात सुमारे 25 टक्के कपात केली आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालक-शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी सीबीएसईने 30 टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. त्यानंतर राज्य शिक्षण मंडळाने सुद्धा कमी करावा, अशी मागणी पालक, शिक्षकांकडून केली जात होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. एकीकडे शाळा बंद आहेत, तरीही शैक्षणिक वर्ष दि.15 जूनपासून ऑनलाइन माध्यमातून सुरू करण्यात आले. त्यात अभ्यासक्रम पूर्ण कसा होईल, याबाबत शंका आहेत. त्यातच अभ्यासक्रम कपातीच्या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे.
आता अभ्यासक्रम कमी केल्याने इयत्ता दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे शक्य होण्याचा अंदाज आहे. या अभ्यासक्रमाची यादी संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेच्या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध केली जाणार आहे.
सध्या ऑनलाइनसह अन्य माध्यमांतून शिक्षण-मार्गदर्शन सुरू आहे. शाळा अद्याप सुरू न झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात तणाव किंवा दडपण येऊ नये, यासाठी पहिली ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
– वर्षा गायकवाड,
शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र