रेडा – कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पूरग्रस्तांना इंदापूर तालुक्यातील जनतेच्या वतीने दैनंदिन जीवनाच्या गरजा भागवण्यासाठी 25 लाखांची मदत करणार आहे. इंदापूर तालुका वाहतूक संघाकडून पिण्याच्या पाण्याचे पंधरा टॅंकर कोल्हापूरला पाठवणार असल्याची माहिती माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
इंदापूर शहरात पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी इंदापूर अर्बन बॅंकेचे चेअरमन भरत शहा, दूधगंगाचे माजी चेअरमन उदयसिंह पाटील, बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव वाघमोडे, रमेश जाधव, चंद्रकांत भोसले, पदाधिकारी उपस्थित होते. पाटील म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री असताना या भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. ही स्थिती आटोक्यात आणण्यासाठी त्यावेळी प्रयत्न केला होता. म्हणूनच संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना यासंबंधी सातत्याने माझा संवाद सुरू आहे. नीरा नदी तसेच भीमा पात्रालगत असलेल्या गावांना पुराचा फटका बसला आहे. पंचनामे करण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. त्यामुळे पंचनामे सुरू होतील.
इंदापूरचे पाच युवक सुखरूप
इंदापूर तालुक्यातील पाच युवक ज्योतिबा येथे देवदर्शनासाठी गेले होते, परंतु महापुरात रस्ते बंद झाल्यामुळे त्यांना एका खासगी विश्रामगृहात निवास करावा लागत आहे. त्यांच्याजवळील रक्कम संपल्यामुळे त्यांना ते लॉज मालक राहू देत नाहीत. त्यांनी आमच्याशी संपर्क केल्यामुळे आम्ही थेट त्या लॉजमालकांना होणारे बिल स्वतः देऊ, असा शब्द दिल्याने पाच युवकांना आधार मिळाला असल्याचीही माहिती पाटील यांनी दिली.