कराड – गत आठवड्यात झालेल्या महापुराचा फटका कराड नगरपालिकेच्या मालकीच्या असणाऱ्या मालमत्तेवरही बसला. या पुरामुळे पाईपलाईन, ड्रेनेज चेंबर, प्रितीसंगम बाग, वारूंजी जॅकवेल तसेच शहरातील रस्त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यासाठी 23.95 कोटी रूपयांची मागणी शासनाच्या नगरविकास विभागाकडे करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली.
कराडसह जिल्ह्यात गत आठवड्यात मुसळधार पावसाने थैमान घातले. कृष्णा व कोयना नद्यांना आलेल्या पूरपरिस्थितीत कराड व पाटण तालुक्याचे मोठे नुकसान झाले. कराड शहरातील प्रीतिसंगम बागेसह काही भाग सलग तीन ते चार दिवस पाण्याखाली गेला होता. प्रीतिसंगम बाग ही कराडमधील प्रमुख सौंदर्यस्थळ म्हणून ओळखले जाते. येथील निर्सग सौंदर्य पाहण्यासाठी अनेक ठिकाणचे पर्यटक येत असतात. प्रीतिसंगम परिसरात स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळासह, बाग, तसेच लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या खेळण्यांची सुविधा करण्यात आली आहे. मात्र दि. 4 ऑगस्ट रोजी कोयनेसह धोम, कण्हेर धरणांतून सोडण्यात आलेल्या महाकाय पाण्यामुळे कृष्णा व कोयना नद्यांना आलेल्या महापुराचे पाणी कराड शहरात घुसले.
यावेळी येथील स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ पूर्णपणे पाण्यात गेला होता. तसेच प्रितीसंगम बागही तीन दिवस पाण्याखालीच होती. या बागेतील अनेक खेळणी, पाईपलाईन, विजेचे खांब, ड्रेनेजलाईन पाण्याखालीच होते. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या मुसळधार पावसाने वारूंजी येथील पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेलची भिंतही ढासळली. शहरातील पालिकेच्या शाळांच्या इमारती, पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपा, शहरातील अनेक रस्ते तसेच पुलाचे प्रचंड नुकसान पावसामुळे झाले आहे. या सर्वांची दुरूस्ती तात्काळ करणे गरजेचे असल्याने पालिकेने शासनाच्या नगरविकास विभागाकडे एकूण 23.95 कोटी रूपयांची मागणी केली
आहे.