नवी दिल्ली – देशातील 23 टक्के मुले झोपण्यापूर्वी स्मार्ट फोन वापरत असतात, असे एका निरीक्षणात स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने अलिकडेच लहान मुलांकडून इंटरनेट सुविधा असलेले मोबाइल फोन आणि इतर उपकरणांच्या वापराचे शारीरिक, वर्तनात्मक आणि मानसिक-सामाजिक परिणाम या विषयावर एक अभ्यास आयोजित केला होता, त्यासाठी देशाच्या सर्व ग्रामीण आणि शहरी भागातील 5000 मुलांची नमुन्यादाखल निवड केली गेली होती.
या अभ्यासानुसार, 23.80 टक्के मुले झोपण्यापूर्वी बिछान्यात असताना स्मार्ट फोन वापरतात, आणि वयानुसार हे प्रमाण वाढते; याचा मुलांवर विपरीत परिणाम होतो.
अयोग्य वेळी स्मार्ट फोनचा वापर केल्यास मुलांच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो. असाच एक परिणाम म्हणजे मुलांमधील एकाग्रतेची पातळी कमी होते.अभ्यासानुसार, 37.15% मुलांना नेहमी किंवा वारंवार, स्मार्ट फोनच्या वापरामुळे एकाग्रता कमी झाल्याचा अनुभव येतो.
राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभ्यासाच्या निष्कर्षांच्या आधारे शिफारस केली आहे – जमिनीचा एक मोठा भाग मुलांसाठी खेळाचे मैदान म्हणून राखून ठेवणे आवश्यक आहे, ज्यामुळे मुलांना विविध खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.