शेतकऱ्यांची मागणी अखेर पूर्ण : भाजप काळातील निर्णय केराच्या टोपलीत
रेडा- इंदापूर तालुक्यातील 22 गावांतील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सातत्याने सोडवण्यासाठी मागणी होत होती. हे 22 गावचे पाणी शेजाऱ्यांनी पळवले होते; मात्र नीरा डावा कालवा यातून 22 गावांसाठी हे पळवलेले पाणी पुन्हा शेतकऱ्यांची शेती सुजलाम सुफलाम् करण्यासाठी मिळणार आहे. तसा कॅबिनेटमध्ये निर्णय झाला आहे, अशी माहिती जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम, पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर येथे दिली.
कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पळविलेले पाणी 22 गावला मिळण्यासाठी निर्णय झाला. हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतीला पोषक ठरणारे आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी आगामी काळात आर्थिक सुधारलेला दिसेल अशी ग्वाही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
पुढच्या आठवड्यात खडकवासला विभागातून ज्या परिसरामध्ये शेतकऱ्यांना पाणी दिले जाते या संदर्भात प्राधिकरणाच्या माध्यमातून खडकवासला लाभधारक शेतकऱ्यांना पाणी मिळवून दिले जाईल. भीमा नदीतील नीरा नदीतील व उजनी धरणातील जे पाणी नाहक पावसाळा काळात वाहून जाते ते पाणी अडविण्यासाठी बुडीत बंधारे अद्यावत निर्माण केले जातील. भांडगाव, अवसरी परिसरातील शेतकऱ्यांना या बुडीत बंधाऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. इंदापूर तालुक्यातील उपेक्षित रस्त्यांच्या कामासाठी 26 कोटीचा निधी मंजूर करून घेतला आहे. तर बजेटमधील एकही रस्ता निधी वाचून अपूर्ण राहणार नाही, अशीही माहिती राज्यमंत्री भरणे यांनी दिली.