सातारा – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज माउलींचा पालखी सोहळा दि. 18 ते 23 जून या कालावधीत जिल्ह्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्यावतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वारकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून आरोग्य विभागाची 22 फिरती पथके सोहळ्यात असणार आहेत.
याचबरोबर वारकऱ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी 31 टॅंकर फिडिंग पॉईंट निर्माण करण्यात आले आहेत. दीड हजार फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली.
वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांची काळजी घेण्यासाठी संबंधित खातेप्रमुख व खंडाळा, फलटण तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना योग्य सूचना देणयात आल्या आहेत. पालखी मार्गावरील सर्व पाणी उद्भवांची पाहणी करुन दि. 17 जूनपासून आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत पाणी शुद्धिकरण करण्यात येणार आहे. टॅंकरमधील पाण्याची चाचणी घेऊन नंतरच पाणी वितरीत केले जाणार आहे. पालखी सोहळा मार्गावर दर पाच किलोमीटरवर एक आरोग्य पथक पुरेशा औषध साठ्यासह कार्यरत ठेवण्यात आले आहे.
दुचाकीवरुन दोन आरोग्य कर्मचाऱ्यांचे एक अशी एकूण 22 फिरती पथके 24 तास पालखी मार्गावर आरोग्य सेवा देणार आहेत. आरोग्य पथकांसाठी आवश्यक असणारा औषध साठा पुरेशा प्रमाणात जिल्हास्तरावरुन पुरवण्यात आला आहे. कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी योग्य ती दक्षता घेण्यात आल्याचे श्री. खिलारी यांनी सांगितले.
पालखी मार्गावरील दुतर्फा असणाऱ्या सार्वजनिक व खासगी विहिरींमधील पाण्याचे पालखी आगमनापूर्वी तीन दिवस ब्लिचिंग पावडरची योग्य ती मात्रा देऊन निर्जंतुकीकरण संबंधित ग्रामपंचायत तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राकडील आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. 31 टॅंकर फिडिंग पॉईंट निर्माण करण्यात आले असून पालखी मार्गावरील 17 गावांमध्ये पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविकांनी समन्वयक म्हणून योग्य भूमिका बजावण्याबाबत त्यांना सूचना दिल्या आहेत.
पालखी सोहळ्यासाठी ग्रामपंचायत विभागामार्फत जिल्हा परिषद स्वनिधीतून 25.25 लाख व इतर असे 50.50 लाख इतकी अनुदानाची तरतूद करण्यात आली असून संबंधित ग्रामपंचायतींना निधी वितरीत करण्यात येत असल्याचे श्री. खिलारी यांनी सांगितले.
घनकचऱ्याचे केले व्यवस्थापन
पालखी मार्गावर निर्मलवारी अंतर्गत 31 सार्वजनिक शौचालय व तात्पुरत्या दीड हजार शौचालयांची सोय करण्यात आली आहे. तात्पुरत्या शौचालयातून निघणाऱ्या मैल्याचे व्यवस्थापन करण्याबाबतही सूचना दिल्या आहेत. वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या शाळा, अंगणवाडी, संस्थात्मक कार्यालयांच्या ठिकाणी शौचालयांची स्वच्छता करण्यात येत आहे. महिला वारकऱ्यांसाठी विशेष शौचालय, इन्सिनेटर मशीन्स्, हिरकणी कक्ष, रुग्णवाहिका यांची सोय करण्यात आली आहे. तळ, दिंड्या इत्यादी ठिकाणच्या ओल्या व सुक्या कचऱ्याचे घनकचऱ्याची व्यवस्थापनामार्फत योग्य ती विल्हेवाट लावण्यात येणार आहे
पर्यायी रस्त्यांची दुरूस्ती पूर्ण
पालखी मार्ग व पालखी कालावधीत जिल्हा परिषदेकडील पर्यायी रस्त्याच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. खंडाळा तालुक्यातील 7 कामांचे व फलटण तालुक्यातील 15 कामांसाठी जिल्हा परिषद स्वनिधीमधून अंदाजे 58 लाख रुपये उपलब्ध करुन पालखी सोहळा लेखाशिर्षमधून रस्त्यांची सुधारणा करण्यात येत आहे. पालखी सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेकडील सर्व विभागांचे नियोजन पूर्ण झाले असून सर्व विभागांना समन्वय साधून सोहळा यशस्वी करण्याबाबत सूचना केल्याचे ज्ञानेश्वर खिलारी यांनी सांगितले.
=======================