मुंबई -भाजपच्या सापत्न वागणुकीमुळे शिवसेनेच्या शिंदे गटातील 22 आमदार आणि 9 खासदारांची कोंडी होत आहे. ते बाहेर पडण्याच्या मनस्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे, असा दावा ठाकरे गटाने केला आहे. शिंदे गटाचे सदस्य असणारे ज्येष्ठ खासदार गजानन कीर्तिकर यांनी नुकतीच भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याची सल उघड केली.
त्याचा आधार घेऊन ठाकरे गटाने आपले मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून भाजपबरोबरच शिंदे गटावर निशाणा साधला. मोठमोठ्या गमजा मारत, गद्दारी करत शिंदे गटाने भाजपशी हातमिळवणी केली. मात्र, वर्षभराच्या आतच बहुधा त्यांचा प्रेमभंग झाला आहे आणि घटस्फोटाच्या गोष्टी होऊ लागल्या आहेत, असे भाष्य अग्रलेखातून करण्यात आले.
सापत्न वागणुकीच्या मुद्द्यावरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने भाजपशी संबंध तोडले. स्वाभिमानाशी तडजोड करून भाजपशी संसार चालवणे असह्य झाल्यानेच शिवसेनेस दूर व्हावे लागले. शिवसेनेचे जमेल तिथे खच्चीकरण करायचे हेच भाजपचे धोरण.
त्यामुळेच शिवसेनेने स्वत:चा बचाव करण्यासाठी स्वाभिमानी बाण्याने भाजपपासून लांब जाणे पसंत केले. विरोधकांचे सोडाच; सहकाऱ्यांचेही हित भाजपला बघवत नाही, अशी बोचरी टिप्पणीही ठाकरे गटाने केली आहे.