पोषण आहार, शैक्षणिक साहित्यांचे नुकसान
पुणे – राज्यात 21 जिल्ह्यांतील 2 हजार 177 जिल्हा परिषद शाळांना पुराचा फटका बसला आहे. या सर्व शाळांच्या वर्ग खोल्यांची दुरूस्ती करावे लागणार असून, 53 पूर्ण वर्गखोल्यांचे बांधकाम करावे लागेल. त्याचप्रमाणे शालेय पोषण आहार, शैक्षणिक साहित्यांचे नुकसान झाले आहे. मुलांची पाठ्यपुस्तके पुरात वाहून गेले आहेत. त्यासाठी या शाळांना 57 कोटींचा निधी आवश्यक असून, तो निधी तातडीने शिक्षण विभागाकडून तातडीने देण्यात येणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री ऍड. आशिष शेलार यांनी दिली.
राज्यातील अतिवृष्टीबाधित शाळांचा आढावा शिक्षणमंत्र्यांनी रविवारी पुण्यात घेतला. यात संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जिल्हे आणि तालुकानिहाय नुकसानीची माहिती घेतली. त्यानंतर शिक्षणमंत्री शेलार यांनी पुरामुळे शाळांचे झालेले इमारतीची पडझड, धोकादायक शाळेच्या इमारतीसह अन्य माहिती दिली. अपर मुख्य सचिव शिक्षण विभाग वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यावेळी उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे 21 जिल्ह्यांतील 155 तालुक्यांत नुकसान झाले आहे. याचा फटका 1 लाख 63 हजार 275 विद्यार्थ्यांना बसला आहे. तातडीने 53 पूर्ण वर्ग खोल्याचे बांधकाम करावे लागणार असून, 2 हजार 177 शाळांच्या वर्ग खोल्या दुरुस्ती करावी लागणार आहे. 36 किचनशेड बाधित झाले असून 477 शाळांमध्ये शालेय पोषण आहार बाधित झाला आहे. तसेच, 260 शाळांमधील 27 हजार 905 विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके ही पुरामुळे बाधित झाली आहेत.
पाठ्यपुस्तके उपलब्ध
राज्याच्या बालभारतीकडे पहिली ते बारावीपर्यंत 30 हजार पाठ्यपुस्तके उपलब्ध आहेत. मराठीसह हिंदी व उर्दू माध्यमाची पुस्तके आहेत. जशी मागणी होईल, त्यानुसार ही पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच किती खासगी शाळा पूरस्थितीने बाधित झाली आहेत, त्याची माहिती घेण्यात येत आहे. अन्य बोर्डातील विद्यार्थ्यांनाही पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचे आदेश शिक्षणमंत्र्यांनी दिले आहेत.