नवी दिल्ली : पाकिस्तानकडून चिथावणीखोर कृत्ये सातत्याने घडत असून या वर्षी तब्बल 2050 वेळा शस्त्रसंधचिे उल्लंघन केले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून रविवारी देण्यात आली. या कारवायात 21 जणांचा मृत्यू होऊनही भारतीय जवानांनी अत्यंत संयमाने त्यास प्रत्यूत्तर दिले असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पाकिस्तानकडून उचापतखोर कारवाया सुरूच आहेत. भारताने काश्मिरमधून 370 कलम हटवल्यानंतर पाकिस्तानचा थयथयाट सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या उपद्व्यापांचा पाढा वाचला.
पाकिस्तानने घुसखोरी आणि शस्त्रसंधीचे 2015 वेळा प्रयत्न केले. त्यात 21 जणांचे बळी गेले. मात्र तरीही भारताने संयमाने प्रत्युत्तर दिले. मात्र घुसखोरीचे असंख्य प्रकार हाणून पाडण्यात आले.प्रत्यक्षात पाकिस्तान आणि भारतीय लष्करामध्ये 2003च्या शस्त्रसंधी कराराचे पालन करायचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार कोणताही तणावाचा प्रसंग उद्भवल्यास फोनवर संवाद साधून अथवा बॉर्डर फ्लॅग मिटींगमध्ये त्यावर संवादाने तोडगा काढायचा असे निश्चित करण्यात आले आहे. मात्र पाकिस्तान लष्कर जाणीवपूर्वक त्याकडे दूर्लक्ष करत आहे, असे त्यात म्हटले आहे.