भुईंज (प्रतिनिधी) – सातारा-पुणे महामार्गावर वेळे गावच्या हद्दीत खंबाटकी बोगद्यात सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास इनोव्हा कारचा अपघात झाला. या अपघातात कारमधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की पुणे बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर वेळे गावच्या हद्दीत खंबाटकी बोगद्यामध्ये पुणे बाजूकडे निघालेले इनोव्हा कार अपघातग्रस्त झाली ही कार कर्नाटक येथील गोकर्ण महाबळेश्वर येथून दर्शन घेऊन पुण्याकडे निघाली होती. पहाटे साडेपाचच्या सुमारास कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने जोरदार अपघात झाला. कारमध्ये सात जण प्रवास करत होते. त्यामध्ये रंजना सराफ आणि शांताबाई जाधव या दोघींचा म्रुत्यू झाला.
जखमी पाच जणांमध्ये दीड वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. इनोव्हा कार खंबाटकी बोगद्याच्या प्रवेशद्वारावर कठड्याला धडकली. मृत पावलेल्या दोघी मायलेकी आहेत. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे