मुंबई – उद्योग विभागाच्या वतीने मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत वर्षभरात थेट विदेशी गुंतवणूक आणि देशातील आघाडीच्या विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करत राज्यात वर्षभरात 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
करोनाच्या संकटाच्या काळात सहा महिन्यातच एक लाख बारा हजार कोटींची गुंतवणूक ही निश्चितच संपूर्ण देशासाठी महाराष्ट्राचे एक उत्तम उदाहरण आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे 25 भारतीय कंपन्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत 61 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून 2 लाख 53 हजार 880 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, जिंदाल ग्रुपचे चेअरमन सज्जन जिंदाल तसेच विविध कंपन्याचे प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, करोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. सध्या करोनाची परिस्थिती समाधानकारक असली तरी युरोपात स्ट्रेन वेगाने पसरत आहे. दुसरीकडे अशा संकट काळातही राज्यात गुंतवणूक होत आहे. घरातून ताकद मिळाल्यानंतर हत्तीचे बळ मिळते. महाराष्ट्राच्या परिवारातील आपण सर्व जण आहोत.
तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. देशाच्या प्रगतीची धारणा महत्त्वाची आहे. कष्ट करण्याची तयारी आपल्या अंगी असेल तर नक्कीच महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. उद्योग मित्र ही संकल्पना उत्तम असून त्यामुळे उद्योजकांच्या अडचणी लवकर दूर होतील आणि कामाला गती मिळेल. उद्योजकांनी या संकटाच्या काळात देखील महाराष्ट्रात गुंतवणूक केली हे महत्त्वाचे असून राज्य सरकार आपल्या सोबत असल्याचे त्यांनी उद्योजकांना आश्वासित केले.