कोलकाता- कोलकातामध्ये भातपारा भागात नव्याने झालेल्या हिंसाचारात 2 जण ठार झाले, तर तिघेजण जखमी झाले आहेत. काही अज्ञात व्यक्तींनी हा हिंसाचार घडवून आणला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या हिंसाचाराची गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकील रज्यचे मुख्य सचिव, पोलिस प्रमुख आणि अन्य प्रमुख अधिकारी उपस्थित राहिले आहेत.
आज झालेल्या हिंसाचारात मरण पावलेल्यांमध्ये 17 वर्षे वयाच्या पाणी-पुरी विक्रेत्याचाही मृत्यू झाला आहे. तर अन्य एकजण जखमी झाल्यावर रुग्णालयात उपचार घेत असताना मरण पावला. अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. आजच्या हिंसाचारादरम्यान काही जणांकडून क्रूड बॉम्ब फेकले गेले होते. तर गोळीबाराचे आवाजही ऐकू आले असल्याचे समजते आहे.
पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि हवेत गोळीबार केल्याचे बोलले जात आहे. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील नव्या पोलिस मुख्यालयाचे उद्घाटन पोलिस प्रमुखांच्या हस्ते होण्याच्या काही तास आगोदर हा हिंसाचार घडला. या हिंसाचारामागे तृणमूलचे गुंडच असल्याचा आरोप भाजपचे खासदार अर्जुन सिंह यांनी म्हटले आहे.