नवी दिल्ली : पुढील वर्षी म्हणजे 2021च्या हिवाळ्याच्या अखेरीस भारतात प्रतीदिवशी 2.87 लाख केरोना बाधित आढळतील, असा इशारा मॅसच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एमआयटी) संशोधकांनी दिला आहे. जर औषधे निघाली नाहीत तर 2021च्या उन्हाळ्यापर्यंत 24 कोटी 90 लाख बाधित असतील तर 18 लाख जण मरण पावले असतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. संशोधक हजहीर रहमानदाद, टी. वाय. लीम आणि जॉन स्टर्मन यांनी हे संशोधन प्रसिध्द केले आहे.हे तिघेही एमआयटीच्या स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे संशोधक आहेत.
संशयित, सापडलेले, संभाव्य बाधित आणि बरे झालेल्या बाधितांच्या अनेक देशातील आकडेवारीवर आधारीत असे हे संशोधन आहे. आदर्श गणितीय पध्दतीचा वापर करून 84 देशातील (सुमारे 4.75 अब्ज नागरिक) संभाव्य करोना बाधितांचा त्यांनी अंदाज मांडला आहे.
आंरराष्ट्रीय प्रवास जाळे आणि पहिला बाधित दाखल झाल्यापसून समूह संसर्गाचा काळ यांचा मेळ घालून हे गृहितक मांडण्यात आले आहे. प्रत्येक देशाच्या लोकसंख्येचा संशयित, लक्षणपूर्व, तपासणी पुर्वीचे बाधित, तपासणीनंतरचे बाधित आणि बरे झालेले असे वर्गीकरण त्यासाठी वापरण्यात आले.
या संशोधनानुसार, 2021च्या हिवाळ्यात दररोज सापडणाऱ्या बाधितांमध्ये पहिल्या 10 देशांमध्ये भारत, अमेरिका, द. अफ्रिका, इराण, इंडोनेशिया, नायजेरिया, तुर्के, फ्रान्स आणि जर्मनी यांचा समावेश असेल. भारताला सर्वाधिक फटका बसेल, त्यापाठोपाठ अमेरिका (95000 बाधित प्रतिदिवशी), द. अफ्रिका (21000 बाधित प्रतिदिवशी), इराण (17000 बाधित प्रतिदिवशी), आणि इंडोनेशिया (13000 बाधित प्रतिदिवशी) यांचा समावेश 2021च्या हिवाळ्यात असेल. त्यावेळी संसर्गाचा वेग 12 पट अधिक आणि मृत्यू संख्या 50 टक्के अधिक असेल.