दम्बुला – मिताली राजच्या निवृत्तीनंतर पहिल्यांदाच बारताचा महिला क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. सध्या संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेच्या दौऱ्यावर असून आज या दोन संघात (दुपारी 2.30 वाजता) पहिला टी-20 सामना रंगणार आहे.
श्रीलंका हा देश सध्या आर्थिक, राजकीय व सामाजिक संकटाचा सामना करत असून या मालिकेचे आयोजनही टीकेचा विषय ठरल्े होते. मात्र, तरीही बीसीसीआय व श्रीलंका क्रिकेट मंडळाने या दौऱ्याला हिरवा कंदील दाखवला. या दौऱ्यात दोन्ही संघात 3 टी-20 तसेच 2 एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहे. टी-20 मालिकेतील सर्व सामने दम्बुलातच होणार असून एकदिवसीय मालिकेचे सामने पालेकेल्लेत खेळवले जाणार आहेत.
भारतीय फलंदाजी कर्णधार हरमनसह स्टार फलंदाज स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, एस. मेघना, शफाली वर्मा, पूजा वस्त्रकार, यस्तिका व तमन्ना भाटिया आणि रीचा घोष यांच्यामुळे भक्कम आहे. गोलंदाजीतही अनुभवी झुलन गोस्वामीच्या अनुपस्थितीत मेघऩा सिंग, रेणुका सिंग, पूनम यादव, सिमरन बहादूर व राजेश्वरी गायकवाड यांच्यामुळे भेदक बनलेली आहे.
श्रीलंकेबाबत बोलायचे तर महिलांच्या चॅलेंज क्रिकेट स्पर्धेत खेळलेली चामरी अटापट्टू त्यांचे नेतृत्व करत आहे. संघात अनेक नवोदित खेळाडू असल्याने ही मालिका त्यांच्यासाठी मोठा अनुभव देणारी ठरणार आहे. तसेच हर्षिता मडवी ही त्यांची प्रमुख फलंदाज आहे व तिने गेल्या काही स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. ही मालिका दोन्ही संघांसाठी आगामी काळात होत असलेल्या विविध स्पर्धांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.