मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या स्वतंत्र बॅंक खात्यात दानशूर व्यक्ती आणि संस्थानी आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळत असून गेल्या 24 दिवसांत 197 कोटी रुपये या खात्यात जमा झाले आहेत. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री साहाय्यता निधीत आतापर्यंत 83 वेगवेगळ्या दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी प्रत्येकी 25 लाखांपेक्षा जास्त रकमेची मदत केली आहे. तर गेल्या दोन दिवसात ग्राफाईट इंडिया, ज्योती लॅब्स, नवीन फ्लूराईन इंटरनॅशनल, जगन्नाथ शेट्टी फाउंडेशन, ब्लू क्रॉस लेबर यांनी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी जमा केला आहे. याशिवाय चिमुकल्यांसह कित्येक व्यक्ती, संस्था, संघटना, उद्योजक, व्यावसायिक आदींनीही आपापल्यापरिने हातभार लावला आहे. त्यामुळेच निधीत आतापर्यंत 197 कोटी रुपये जमा झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सर्व दानशूरांचे आभार मानले आहेत.